सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वडसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनासाठी आणलेली वडाची रोपे जतन करणे शक्य नसल्यास ती ढगा डोंगर संवर्धन समितीकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन समितीने केले आहे. पूजनानंतर अनेक रोपे योग्य देखभालीअभावी वाया जात असल्याने त्यांचे संगोपन, संवर्धन व वृक्षारोपण करण्याची जबाबदारी समिती स्वीकारणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी विजयनगर, एनडीसीसी बँक कॉलनी, बसवेश्वर चौक, १४ चौक वाडा, शिवाजी चौक, तानाजी चौक, व्हावी वेस, लोंढे गल्ली, संगमनेर नाका, वारकरी भवन, खर्जे मळा, कोपरकर मळा, छत्रपती चौक व शिवाजीनगर आदी भागांत प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रतिनिधीकडे वडाची रोपे जमा करावीत, असे समितीने म्हटले आहे.
“पूजनानंतर रोपे वाया जाऊ देऊ नका; ती आमच्याकडे द्या, त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ,” असे आवाहन समितीने करत पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही नमूद केले आहे.























