गेवराई: (प्रतिनिधी) दैनिक ‘झुंजार नेता’चे गेवराई तालुका प्रतिनिधी आणि आपल्या निर्भीड लेखणीने समाजमनाचा वेध घेणारे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिंदे यांचे शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी रुग्णालयात उपचार सुरू असताना अकाली निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रावर आणि मित्रपरिवारावर मोठी शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शिंदे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याने काल शुक्रवारीच त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ते लवकरच बरे होऊन पुन्हा आपल्या सहकाऱ्यांमध्ये सक्रिय होतील, अशी आशा सर्वांना होती. मात्र, शनिवारी दुपारी अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. कालपर्यंत घरी परतण्याची आशा असताना आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे तलवाडा सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या सुभाष शिंदे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केली. आपल्या निर्भीड, परखड आणि निःपक्षपाती पत्रकारितेच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच शहरी भागातही पत्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.सुभाष शिंदे यांनी आपल्या दीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत नेहमीच शोषित, पीडित आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना त्यांनी कधीही आणि कोणाशीही तडजोड केली नाही. आयुष्यभर इतरांचे सुख-दुःख, त्यांच्या समस्या आणि त्यांचा संघर्ष आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडणारा एक जिवंत आवाज आज कायमचा शांत झाला आहे. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रातील एका प्रामाणिक आणि लढवय्या नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी जड अंतःकरणाने शोक व्यक्त केला आहे.






















