सात लाख मे.टन ऊस गाळपासाठी जय भवानीची
यंत्रणा सज्ज – चेअरमन अमरसिंह पंडित
गेवराई, दि.१ (प्रतिनिधी): जय भवानी सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या हंगामाची सर्व तयारी केली असून या हंगामात सात लाख मे.टन ऊस गाळपासाठी जय भवानीची यंत्रणा सज्ज असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले आहे. कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाच्या रोलर पूजन समारंभात ते बोलत होते. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड संस्थानचे महंत ह.भ.प. जनार्धन महाराज यांच्या शुभहस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी, कर्मचारी, वाहतुक व ऊस तोडणी ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाचा रोलर पूजन समारंभ शुक्रवार, दि.३१ जुलै रोजी संपन्न झाला. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड संस्थानचे महंत ह.भ.प. जनार्धन महाराज आणि कारखान्याचे संचालक संभाजीराव पवळ यांच्याहस्ते विधीवत रोलर पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, युवा नेते पृथ्वीराज पंडित यांसह मान्यवर उपस्थित होते. सन २०२५ -२६ च्या ४३ व्या गळीत हंगामात कारखान्याने ५ लाख २४ हजार ७८७ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ५५ हजार ३५५ पोती साखरेचे उत्पादन केले. सरासरी १०.२८ टक्के साखर उतारा या हंगामात मिळाला असून आसावनी प्रकल्पातून ७७.९८ लाख बल्क लिटर बी-हेवी स्पिरीटचे उत्पादन झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी बोलताना चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १३ हजार हेक्टरवर ऊस लागवड झालेली आहे. कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर सभासदांनी ऊसाची नोंदणी केलेली आहे. यावर्षी संगणक प्रणालीद्वारे ऊस नोंद केल्यामुळे याच प्रणालीतून पारदर्शक पध्दतीने ऊसतोडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ४४ व्या गळीत हंगामासाठी कारखान्याने ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी लागणारी ऊसतोडणी व वाहतुकीची यंत्रणा कारखान्याने उभारली असून या बाबतचे सर्व करार पूर्ण होऊन पहिल्या हप्त्याचे वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे उद्दिष्टाप्रमाणे काम करण्यासाठी जय भवानीची यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जय भवानीच्या रोलर पूजन समारंभास बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी उपसभापती विकास सानप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, जालिंदर पिसाळ, गजानन काळे यांच्यासह बाजार समिती, खरेदी विक्री संघ, भवानी अर्बन बँक यांचे पदाधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाला कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ऊसतोडणी व वाहतुक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.























