ब्रह्मपुरी येथील रामदेवबाबा सॉल्व्हंट कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. प्रकल्पातून निघणारे काळे, प्रदूषित पाणी थेट ‘भूती नाल्यात’ सोडले जात असल्याने परिसरातील भूजल पातळी आणि पिण्याच्या विहिरी गंभीररीत्या दूषित झाल्या आहेत. या प्रदूषित पाण्याच्या वापरामुळे उदापूर आणि बोरगावसह ७ गावांतील तब्बल १९८ नागरिकांना गंभीर चर्मरोगाची (त्वचारोग) लागण झाल्याचा खळबळजनक अहवाल जिल्हा आरोग्य विभागाने सादर केला आहे. या धक्कादायक अहवालानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, “आजी-माजी आमदार आणि राजकीय नेते या कंपनीला कुलूप ठोकणार की तिची पाठराखण करणार?” असा थेट सवाल जनतेने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एमपीसीबी निर्देशानुसार, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने १७ ते २१ जुलै दरम्यान या प्रभावित भागांमध्ये घरोघरी जाऊन सखोल सर्वेक्षण केले. या प्राथमिक आरोग्य तपासणीत खालील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत
उदापूर, बोरगाव, झिलबोडी, परसोडी, पारडगाव या ग्रामीण भागांसह ब्रह्मपुरी शहरातील पेठवार्ड आणि फुलेनगर या वस्त्यांमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्वचेचे आजार झाले आहेत.
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या अंगावर खाज सुटणे, पुरळ उठणे, त्वचा काळी पडणे आणि जखमा होणे अशा गंभीर चर्मरोगांचे प्रमाण वाढले आहे.
केवळ पाणीच नाही, तर या इथेनॉल प्रकल्पातून निघणाऱ्या उग्र आणि दुर्गंधीयुक्त हवेमुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या भीषण प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, स्थानिक राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ‘टाइम ऑफ महाराष्ट्र’ माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, ब्रह्मपुरीतील आजी-माजी आमदार आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी लोकांच्या रडारवर आले आहेत.
स्थानिक युवक आणि सामाजिक संघटनांनी आजी-माजी आमदारांना थेट इशारा दिला आहे की, जर लोकप्रतिनिधींनी या प्रदूषणकारी इथेनॉल प्रकल्पावर जाऊन तात्काळ ‘टाळे ठोको’ आंदोलन केले नाही, तर जनता त्यांना धडा शिकवेल.
आर्थिक हितसंबंधांचा संशय: औद्योगिक विकास आणि रोजगाराच्या नावाखाली काही नेते या मोठ्या प्रकल्पाची छुप्या पद्धतीने पाठराखण करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही याच प्रकल्पात झालेल्या एका मोठ्या स्फोटानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
आरोग्य विभागाचा अधिकृत अहवाल आता प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यामुळे कंपनीने पर्यावरण नियमांचे सरळ उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले आहे. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमपीसीबी या कंपनीवर तात्काळ टाळेबंदीची कारवाई करते की राजकीय दबावापुढे झुकते, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे आणि ब्रह्मपुरी तालुक्याचे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“आमच्या विहिरींचे पाणी विषारी झाले आहे. अंगावर जखमा होत आहेत. राजकीय नेत्यांनी आता तरी एसी गाड्यांमधून बाहेर पडावे आणि या कंपनीला कुलूप ठोकावे, अन्यथा आम्ही त्यांना गावात पाय ठेवू देणार नाही.”— प्रदूषणग्रस्त ग्रामस्थ, ब्रह्मपुरी परिसर.






















