दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, राहुल आढाव): शहरातील खाटीकगल्ली परिसरात गोवंश कत्तल करण्याच्या उद्देशाने चार जर्शी गायी बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दौंड पोलिसांनी ईदगा मैदानाजवळ छापा टाकून असीफ कासम कुरेशी (रा. खाटीकगल्ली, ता. दौंड) याच्या राहत्या घराजवळील काटवनातून चार लहान-मोठ्या जर्शी गायी ताब्यात घेतल्या.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या गायी कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून बांधून ठेवल्या असल्याचे निष्पन्न झाले. सुमारे ४५ हजार रुपये किमतीच्या या गायी सुरक्षिततेसाठी तात्काळ गोशाळेत हलविण्यात आल्या. आरोपीविरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर शहरातील नागरिक, गोरक्षक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, अशा प्रकारचे प्रकार इतर ठिकाणीही घडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त, गोपनीय तपास तसेच गोवंश कत्तल व तस्करी रोखण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






















