Times of Maharashtra : मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष जिव्हाळ्याचे शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट राजकीय सामना रंगणार आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची कसोटी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरे गटावर जोरदार टीका होत आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गट सत्तेचा व पैशाचा गैरवापर करून निवडणूक लढवत असल्याचा पलटवार ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बीड दौऱ्यावर असताना मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत वातावरण अधिक तापवले आहे.
खैरे यांनी आरोप केला की, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून उमेदवार ‘मॅनेज’ करून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जात आहेत. मतदारांची मते विकत घेण्याचा प्रकार आत्तापासूनच सुरू असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. पैसे वाटप करताना कोणी आढळून आले, तर त्याला जाहीरपणे जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
हिंदुत्वावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना खैरेंनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर कडाडून टीका केली. आम्ही हिंदुत्वविरोधी असतो तर रुद्राक्षाच्या माळा, गंध धारण केले नसते. हिंदुत्व तुम्ही संपवले, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. यासोबतच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. बावनकुळे हे पूर्वी इलेक्ट्रिक कंत्राटदार होते. नितीन गडकरींनी त्यांना राजकारणात आणले आणि आज ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. ते नेते बदलणारे असून त्यांना विषयाची जाण नाही, असा एकेरी उल्लेख करत खैरेंनी त्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
छत्रपती संभाजीनगर हे बाळासाहेब ठाकरे यांना विशेष प्रिय शहर होते, हे आठवण करून देत खैरेंनी या निवडणुकीत विजय मिळवून महापालिकेत ठाकरे गटाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच, ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.






















