अनिल वायाळ ( बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) : लोणार तालुक्यात १९ मार्च २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विशेषतः कांदा आणि चिया पिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) तालुका अध्यक्ष राजेंद्र बुधवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी घेतलेल्या कांदा व चिया पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर किंवा ई-पीक पाहणीमध्ये संबंधित पिकांची किंवा शेडनेटची नोंद नाही, त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
प्रत्यक्ष पंचनाम्यात शेतात कांदा व चिया पिकांचे अस्तित्व स्पष्ट दिसत असतानाही केवळ तांत्रिक नोंदीअभावी मदत नाकारणे अन्यायकारक असल्याचे बुधवत यांनी नमूद केले. “प्रामाणिकपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे वंचित ठेवणे चुकीचे आहे. प्रशासनाने वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पीक होते, अशा सर्वांचा पंचनामा करून त्यांना प्रति एकर एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 7/12 किंवा ई-पीक नोंद नसल्यामुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीने मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






















