निलेश ठाकरे (महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज) : चंद्रपूर दुय्यम निबंधक कार्यालयावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप. चंद्रपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात सापडले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्ता नोंदणी प्रक्रियेला अक्षरशः ‘दर’ लावल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. प्लॉट, शेती किंवा इतर मालमत्ता नोंदणी करताना अधिकृत शुल्काव्यतिरिक्त हजारो नव्हे तर लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उप दुय्यम निबंधक अधिकारी स्वतः थेट व्यवहार न करता काही ठराविक दस्तलेखकांच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करत असल्याचा आरोप आहे.
म्हणजेच, नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रथम दस्तलेखकांकडे पाठवले जाते आणि त्यानंतरच ‘सेटिंग’नुसार पुढील प्रक्रिया केली जाते. या साखळीमध्ये प्रत्येक टप्प्यावर पैसे घेतले जात असल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे, प्रत्येक प्लॉट किंवा शेती नोंदणी करताना दस्तलेखकांना देखील उप निबंधक अधिकाऱ्यांना ठरलेला वाटा द्यावा लागतो, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ही केवळ एक-दोन व्यक्तींची बाब नसून संपूर्ण यंत्रणाच या गैरप्रकारात गुंतलेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे, चंद्रपूरमधील एका मोठ्या लेआऊटच्या नोंदणीवेळी तब्बल १० लाख रुपयांची मागणी वसूल केल्याची धक्कादायक माहिती तक्रारदारांनी दिली आहे. इतक्या मोठ्या रकमेची उघडपणे मागणी होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची किती पिळवणूक होत असेल, याची सहज कल्पना येते.
याच प्रकरणात फेरफार (Mutation) नोंदी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच, नोंदणीपासून ते फेरफार प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ‘कमिशन’ची साखळी कार्यरत असल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी, शासनाने ठरवलेल्या नियमांना हरताळ फासून एक स्वतंत्र ‘भ्रष्ट व्यवस्था’च येथे उभी राहिली आहे.
या सर्व प्रकारामुळे चंद्रपूरमधील नागरिक त्रस्त झाले असून, “पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही” अशी भावना सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. अनेकांनी भीतीपोटी उघडपणे तक्रार करण्यास टाळाटाळ केली असली, तरी आता काही धाडसी नागरिक पुढे येत असून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. जर या तक्रारीची निष्पक्ष चौकशी झाली, तर चंद्रपूर दुय्यम निबंधक कार्यालयातील अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
आता प्रश्न असा आहे की, शासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? की हा प्रकारही इतर प्रकरणांप्रमाणे दडपला जाणार? चंद्रपूरकरांना याचे उत्तर लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे.






















