निफाड (प्रतिनिर्धी उतम जाधव ): वनसगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त पंचशील बुद्ध विहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचा आणि देशाचा मार्ग बदलला. त्यांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून बाबासाहेबांचे विचार समाजात रुजवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पांडुरंग निरभवणे यांनी बुद्ध वंदना सादर केली. माणुसकी सामाजिक फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती सागर निकाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश बनकर यांनी केले.
सायंकाळी भव्य मिरवणूक काढून जयंतीचा समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमगर्जना मित्र मंडळाने विशेष प्रयत्न केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.






















