गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :बीड जिल्ह्यातील गढी येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या वेळी “प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञान, यश आणि कर्तृत्वाची उंची गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र अभ्यासावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक सत्यशोधक ॲड. सुभाष निकम यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार भोस होते. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे, सत्यशोधक प्रभाकर घोडके तसेच उपप्राचार्य सुधाकर वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी भीमगीत व स्वागतगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. यानंतर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित मनोगते व्यक्त केली, तर ठाकूर सरांनी गीत सादर केले.
आपल्या प्रमुख भाषणात ॲड. निकम यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम आणि ज्ञानाची अखंड साधना यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. भारतीय संविधान हा मानवता, स्वातंत्र्य आणि समानतेचा अनमोल दस्तावेज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. राजेंद्र बरकसे आणि प्राचार्य भोस यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भीमगीतावर आधारित नृत्य व लघुनाटिका सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.






















