पुणे | टाईम्स ऑफ महाराष्ट्र : फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी टाईम्स ऑफ महाराष्ट्र ने प्रसिद्ध केला होता. हा व्हिडिओ गाडीतळ पोलिस चौकीसमोरच बेकायदेशीररीत्या सुरू असलेली क्रियाकलाप दर्शवतो. व्हिडिओ पसरल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही दृश्यमान कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांनी “व्हिडिओ जुना आहे” असा दावा करत संवाद टाळण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार “फोन ठेवा” म्हणत पत्रकाराचा फोन उद्धटपणे कट केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे वर्तन स्वतः पोलीस यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या संशयास्पद शांततेवर प्रश्नचिन्ह उपस्थितच असताना, आता नबी खाजा पटेल यांच्या कडून टाइम्स ऑफ महाराष्ट्र कडे एक गंभीर अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जामुळे फरासखाना पोलिस ठाण्यातील निष्काळजीपणा आणि भोंगळ कारभार आणखीनच उघडकीस आला आहे.
फिर्यादी नबी पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला तरीही कोणतीही कारवाई नाही
गणेश पेठ येथे इलेक्ट्रिकल काम करणारे नबी खाजा पटेल (वय 24) यांच्यावर २१ ऑक्टोबर २०२५ रोजी अजर इसरार सय्यद उर्फ बडे व त्याच्या साथीदाराने हल्ला केला या घटनेत, अत्यंत अश्लील शिवीगाळ, बांबूने मारहाण, जीवे मारण्याची धमकी, धारदार शस्त्र घेऊन पाठलाग असा जीवघेणा प्रकार घडला. आरोपीचा पूर्वेतिहास गुन्हेगारीने भरलेला असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. तरीसुद्धा, आजतागायत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही , ही सर्वात मोठी धक्कादायक बाब आहे.
तक्रार द्यायला गेल्यावर उलट फिर्यादीचीच चौकशी
घटनेची तक्रार देण्यासाठी नबी पटेल गणेश पेठ पोलिस चौकीत गेले असता, पोलीस कर्मचारी आनंद घोलप (बॅच २३७७) यांनी घटनेशी असंबंधित, वैयक्तिक स्वरूपाचे आणि अपमानास्पद प्रश्न विचारून तक्रार नोंदवण्यास अडथळा आणला. ज्यामध्ये “तुझ्या बहिणी किती आहेत?”, “तुझी आई काय करते?”, “बहिणींचं वय काय?”, “आईचं नाव काय?” अशा प्रश्नाचा समावेश होता, या चौकशीचा हेतू काय? एक पीडित व्यक्तीची छळवणूक की आरोपीचे संरक्षण? फिर्यादीकडे या गैरवर्तणुकीचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे उपलब्ध आहेत.
फरासखाना पोलिसांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात
या दोन घटनांवरून खालील गंभीर मुद्दे स्पष्टपणे समोर येतात, अवैध धंदे चौकीसमोर चालू पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही, वरिष्ठ निरीक्षक पत्रकाराशी उद्धटपणे वागतात, फिर्यादीवरील हल्ल्या वरकोणतीही कारवाई नाही, उलट फिर्यादीकडून वैयक्तिक प्रश्न विचारून छळ, आरोपींचा गुन्हेगारी इतिहास माहित असूनही दुर्लक्ष, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्हाखालील कारभार या सर्वांवरून पोलिस प्रशासन स्वतःचा कारभार लपवत आहे की गुन्हेगारांच्या जगातल्या क्रियाकलापांना संरक्षण देत आहे, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र चौकशीची मागणी
नबी पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना आजही जीवाचा धोका आहे आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाने आरोपी अधिक बेजबाबदार झाले आहेत. नागरिकांचा विश्वास राखण्यासाठी आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी या प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र चौकशी, तसेच जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.






















