गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई मतदारसंघातील गोदावरीनदी व सिंदफणानदी या दोन वाहणाऱ्या नदी चे नैसर्गिक सौंदर्य सध्या गंभीर धोक्यात आले आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तसेच वीटभट्ट्यांसाठी लागणाऱ्या काळ्या मातीचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असून, पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.
विशेषत तालुक्यातील काही दलालांनी संगनमताने नदीपात्रातील ‘काळे सोने’ मानली जाणारी सुपीक माती उपसून त्याचा मोठा साठा करून ठेवला आहे. गेवराई शहरात व परिसरात तर या मातीचा वापर करून वीटभट्ट्यांसाठी कृत्रिमरित्या मोठमोठे मातीचे ‘पर्वत’ उभे करण्यात आले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे खामगाव आगरनांदूर राक्षसभुवन राजापूर पुलालगत सुमारे २०० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या उत्खननामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होण्याची शक्यता असून पुलालाही धोका निर्माण होऊ शकतो.
नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून, बाहेर काढलेल्या मातीचे प्रचंड ढिगारे साठवले जात आहेत. यामुळे परिसराच्या भौगोलिक रचनेत बदल होत असून शेती, रस्ते आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महसूल व पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अवैध उत्खनन त्वरित थांबवावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.






















