जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातील अयोध्या नगर परिसरात हिंदू समाजाच्या ऐक्य, समरसता आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणारे “भव्य हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून बंधुभाव दृढ करण्यासोबतच सामाजिक एकात्मतेची भावना अधिक बळकट करण्याचा या संमेलनाचा उद्देश आहे.
“हिंदवः सोदराः वै, न हिंदू पतितो भवेत्। मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्रः समानता॥” या विचारधारेवर आधारित या संमेलनातून हिंदू समाजातील परस्पर सहकार्य, समता आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला जाणार आहे. परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करत भविष्यात अधिक सक्षम आणि संघटित समाज उभा करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला जाणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सामाजिक समरसता मंचाचे श्री. रमेश बापू महाजन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ह.भ.प. श्री. पांडुरंग नरसिंह बोधले (जळगाव) यांचे आशीर्वचन लाभणार असून, त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थितांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सदर संमेलन गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बि.यु.एन. रायसोनी शाळा, अयोध्या नगर, जळगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमास हिंदू समाजातील सर्व घटकांनी कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाचे आयोजन हिंदू संमेलन समिती, अयोध्या नगर यांच्या वतीने करण्यात आले असून, समाजहिताच्या या कार्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव शहर प्रचार विभाग सदस्य प्रशांत विसपुते यांनी दिली.






















