Times Of Maharashtra Desk : पुणे कात्रज बोगद्याजवळ घडलेल्या एका थरारक घटनेत आंबेगाव पोलिसांच्या तत्परतेमुळे एका तरुणीचा जीव वाचवण्यात यश आले होते. हि घटना २० मार्च रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गालगतच्या उंच टेकडीवर घडली होती . कौटुंबिक वादातून मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणीने तब्बल २५० फूट उंच टेकडीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तिच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेत तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच आंबेगाव पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते . परिस्थिती अत्यंत गंभीर होती, कारण तरुणी कोणत्याही क्षणी उडी मारू शकत होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संयमाने परिस्थिती हाताळली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मुलाणी यांनी पुढाकार घेत सुमारे ३० मिनिटे तरुणीशी शांतपणे संवाद साधला. त्यांनी तिचा विश्वास संपादन करत तिला समजावून सांगितले की तिच्या समस्यांवर मार्ग काढता येऊ शकतो. त्यांच्या समुपदेशनामुळे तरुणीने आत्महत्येचा विचार सोडून सुरक्षितपणे मागे येण्याचा निर्णय घेतला.
या धाडसी आणि संवेदनशील कृतीमुळे एका तरुणीचे प्राण वाचले. या कामगिरीबद्दल टाईम्स ऑफ महाराष्ट्राचे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख आणि सामाजिक कार्यकर्ते इलियाज शेख यांच्यावतीने संबंधित पोलिसांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या घटनेतून पोलिसांच्या धाडसाबरोबरच त्यांच्या समुपदेशन कौशल्याचाही प्रत्यय आला असून, समाजाकडून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.






















