गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना थंड आणि आरोग्यदायी पेय म्हणून ऊसाच्या रसाला नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. गेवराई तालुक्यासह राज्यभर तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना उष्णतेचा मोठा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी ऊसाचा रस हा सर्वसामान्यांचा आवडता पर्याय ठरत आहे.
उन्हाळा सुरू होताच शहरांसह ग्रामीण भागातही रसवंतीगृहांची संख्या वाढू लागली आहे. गेवराई तालुक्यातही अनेक ठिकाणी नव्याने रसवंतीगृहे सुरू झाली असून, दिवसभर ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. ऊसाचा रस हा कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तो सहज परवडतो. अवघ्या 15 रुपयांत मिळणाऱ्या या रसामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक त्याचा आस्वाद घेत आहेत. महागड्या कोल्ड्रिंक्स आणि आइस्क्रीमपेक्षा ऊसाचा रस अधिक आरोग्यदायी असल्याने त्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
दरम्यान, वाढलेल्या वीजदरामुळे रसवंतीगृह चालकांसमोर काही अडचणीही निर्माण झाल्या आहेत. ग्राहक नसताना यंत्रणा सुरू ठेवणे परवडत नसल्याने व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन कल्पना वापरली आहे. अनेक रसवंतीगृहांच्या बाहेर स्पीकरद्वारे घुंगरांचा आवाज लावण्यात येत असून, या आवाजामुळे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना सहजपणे रसवंतीगृहाची ओळख पटते आणि त्यांची पावले त्या दिशेने वळतात.
गेवराई तालुका हा ऊस उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते. येथील शेतकरी उत्पादित ऊस विविध साखर कारखान्यांना पाठवतात, ज्यामध्ये स्थानिक तसेच इतर जिल्ह्यांतील कारखान्यांचा समावेश आहे. ऊस शेतीमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत असून, दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.
आरोग्याच्या दृष्टीनेही ऊसाचा रस अत्यंत फायदेशीर मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, हा रस शरीरातील उष्णता कमी करून ऊर्जा वाढवण्यास मदत करतो. बर्फ किंवा इतर घटक न टाकता ताजा ऊसाचा रस पिणे अधिक लाभदायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
वडगाव ढोक येथील रसवंती चालक संभाजी गोरे यांनी सांगितले की, त्यांचा व्यवसाय बारा महिने सुरू असतो आणि नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. विशेषतः लग्नसराईच्या काळात व्यवसायात अधिक वाढ होते.
एकूणच, वाढत्या उन्हाळ्यात ऊसाचा रस हा नागरिकांसाठी दिलासा देणारा आणि आरोग्यदायी पर्याय ठरत असून, यामुळे रसवंतीगृह व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे.






















