जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सर्व शासकीय विभागांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात असून, उष्माघाताचा धोका लक्षात घेता दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कामगारांच्या सुरक्षिततेसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हात कामे थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
शाळा, महाविद्यालये आणि मनरेगा कामांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जात आहे. तसेच शहरातील उद्याने दिवसभर खुली ठेवणे, पाण्याची व्यवस्था, टँकर सेवा आणि सावलीची सोय यावर प्रशासनाचा भर आहे.
उष्णतेची लाट कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या सूचना :
• भरपूर पाणी प्या
• दुपारी १२ ते ४ बाहेर जाणे टाळा
• सैल व हलके कपडे परिधान करा
• अनावश्यक प्रवास टाळा
• लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.






















