जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रांजणी येथील मैत्रेय बुद्ध विहारात भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. रात्री ८ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात गावातीलच सुपुत्री, बेटावद हायस्कूलच्या आदर्श शिक्षिका, समाजसेविका, लेखिका व कवयित्री श्रीमती रंजना कोळी इंगळे यांनी प्रथमच महिला व्याख्यानकार म्हणून प्रभावी उपस्थिती नोंदवली. त्यांनी आपल्या ओघवत्या आणि सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा सखोल आढावा घेतला.
विशेष म्हणजे, त्यांनी “हिंदू कोड बिल” या महत्त्वपूर्ण कायद्याबाबत ग्रामीण महिलांना अत्यंत सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले. हे बिल काय आहे, ते कोणी तयार केले, त्यासाठी किती संघर्ष करावा लागला आणि डॉ. आंबेडकरांनी ते संसदेत कसे मंजूर करून घेतले, याबाबत त्यांनी प्रभावी मांडणी केली.
यावेळी त्यांनी महिलांना आपल्या हक्कांची जाणीव करून देत संविधान आणि हिंदू कोड बिल वाचण्याचे आवाहन केले. तसेच, ‘भिम जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करूया’ असा प्रेरणादायी संदेश देत गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय उभारण्याचा संकल्पही मांडला. वाचनालयासाठी कपाटे देणगी स्वरूपात देण्याची घोषणाही त्यांनी केली.
गावातील या लेकीच्या प्रेरणादायी व्याख्यानाने संपूर्ण महिला वर्ग भारावून गेला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली, ज्यामुळे सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होण्याची चिन्हे दिसून आली.






















