Times Of Maharashtra : राज्यभरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यान मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. यंदा पारंपरिक न मिटणाऱ्या शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आल्याने ही शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी विविध ठिकाणांहून समोर येत आहेत. त्यामुळे बोगस मतदानाचा धोका वाढल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३४ (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी) येथे काही महिला आणि अल्पवयीन मुलांकडून बोटावरील शाई लिक्विड किंवा फिनरने पुसून पुन्हा मतदान केल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. धायरी फाट्याजवळील नारायणराव सणस विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर अशाच संशयित प्रकारात एका व्यक्तीला पकडण्यात आल्याची घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबईतही असाच प्रकार समोर आला असून मतदान करून परतलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील मार्करची शाई पुसली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी नखावरील शाई पुसली जात असल्याची कबुली दिली आहे. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मतदान केंद्रावरही अशाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की २०१२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मार्करचा वापर केला जात आहे. मात्र, मतदानाच्या ऐनवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उल्हासनगरमध्येही मतदानानंतर बोटावरील शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षितता आणि विश्वासार्हतेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली असून आयोगाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.






















