विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी): जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्राथमिक टप्प्यातील चाचण्यांनंतर ५०० उमेदवारांपैकी १२० उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. ही प्रक्रिया ११ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हा पोलिस मुख्यालयात अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडत आहे.

पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात प्रक्रिया; गैरप्रकारांना ठाम नकार
पोलिस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची शारीरिक क्षमता, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर निकषांनुसार काटेकोर छाननी करण्यात येत आहे. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही निरीक्षणाखाली होत असून प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखली जात आहे.
दरम्यान, उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलिस भरतीसाठी पैसे देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारची मागणी कोणी केल्यास तात्काळ पोलिस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असेही सांगण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या १२० उमेदवारांना लेखी परीक्षा व वैद्यकीय तपासणीसाठी निश्चित वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने उमेदवारांना प्रामाणिकपणे व नियमांचे पालन करून प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
( डॉ. महेश रेड्डी – पोलिस अधीक्षक )




















