Times Of Maharashtra Desk : शिरूर अनंतपाळ तालुक्यातून राज्यातील विविध शहरांकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बस सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ लातूर यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिरूर अनंतपाळ तालुक्यातून पुणे, संभाजीनगर (औरंगाबाद), परभणी, लातूर, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी जाण्यासाठी सध्या थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, नोकरी करणारे तसेच व्यापारी वर्गाला प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः शिरूर अनंतपाळ येथून पुणे, संभाजीनगर, परभणी, लातूर, मुंबई व नाशिक या मार्गांवर लांब पल्ल्याच्या एसटी बस सेवा सुरू केल्यास तालुक्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. सध्या प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे आर्थिक भार वाढत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांवर लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी शिरूर अनंतपाळ येथील नागरिकांनी स्वाक्षरी करून निवेदन सादर केले. निवेदन देताना धनंजय देवंग्रे व संदीप धुमाळे उपस्थित होते.






















