कोंढवा परिसरातील वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत काँग्रेसचे शोएब खान यांनी दिले निवेदन…
कोंढवा – कोंढवा परिसरातील नागरिक गेल्या काही काळापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. या गंभीर समस्येबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEB) च्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कोंढवा विभाग, पुणे यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले की, संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस सातत्याने वीज खंडित होत असून, यामुळे महिलांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तासन्तास वीजपुरवठा खंडित राहतो आणि याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. सतत वीज जाण्यामुळे घरगुती कामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, मुलांचे शिक्षण व नागरिकांचे आरोग्य यावर गंभीर परिणाम होत आहेत.
कोंढवा परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असूनही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य पावले उचलली जात नसल्याबद्दल नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे कोंढवा प्रभाग क्रमांक 27 चे अध्यक्ष शोएब खान यांच्यावतीने देण्यात आला.
हे निवेदन हडपसर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस अध्यक्ष दिलीप तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे सुलतान खान, अकबर शेख, नूर शेख, देविदास लोणकर, माया डुरे, शाहबाज शेख, मोहसीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांनी वीजपुरवठा नियमित होण्याची आणि प्रशासनाकडून तातडीने ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.






















