गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मार्चच्या सुरुवातीपासून वाढलेल्या उकाड्यामुळे शहरात थंड पेयांची मागणी झपाट्याने वाढली आहे. रस्त्यावरील लिंबूपाणी, सरबत, ताक, लस्सी, उसाचा रस यांसारख्या पेयांच्या गाड्या शहरभर दिसू लागल्या आहेत; मात्र या पेयांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘रिअॅलिटी चेक’ मध्ये गंभीर चित्र समोर आले आहे.
शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक परिसर आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात हातगाड्या सुरू
असल्याचे दिसून आले. काही विक्रेते स्वच्छ पिण्याचे पाणी, फिल्टर किंवा कॅन वॉटरचा वापर करताना दिसले, तर अनेक ठिकाणी कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय पाणी वापरले जात असल्याचेही निदर्शनास आले. बर्फाच्या वापराबाबतही स्थिती चिंताजनक आहे.
बहुतांश ठिकाणी बर्फ कुठून आणला जातो, तो पिण्यायोग्य पाण्यापासून बनवलेला आहे का, याबाबत कोणतीही स्पष्टता नसते. उघड्यावर ठेवलेला बर्फ आणि त्याची हाताळणी ही स्वच्छतेच्या निकषांवर अपुरी ठरत असल्याचे आढळले. रस्त्यावरील सर्वच शीतपेये असुरक्षित आहेत, असे ठामपणे म्हणता येत नाही; मात्र मोठ्या प्रमाणात स्वच्छतेच्या त्रुटी आणि देखरेखीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे नागरिकांनी थंड पेय घेताना जागरुकता बाळगणे आणि स्वच्छतेची खात्री करूनच सेवन करणे आवश्यक आहे.
कृत्रिम रंग आणि साहित्याचा प्रश्न
रंगीत सरबत, बर्फाचे गोळे यासाठी वापरले जाणारे कृत्रिम रंग आणि सिरप यांचा दर्जा तपासण्याची कोणतीही यंत्रणा प्रत्यक्ष पातळीवर सक्रिय नसल्याचे दिसते. काही विक्रेते ब्रँडेड सिरप वापरत असले तरी अनेक ठिकाणी स्वस्त व अनधिकृत रंगांचा वापर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तज्ज्ञ काय सांगतात?
तज्ज्ञांच्या मते, अशुद्ध पाणी किंवा दूषित बर्फामुळे पोटाचे विकार, अतिसार, उलट्या,
टायफॉइडसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी पेये आवश्यक असली तरी स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषद चे दुर्लक्ष
अन्न व औषध प्रशासन आणि नगरपरिषद कडून नियमित तपासणी अपेक्षित असली तरी प्रत्यक्षात कारवाई मर्यादित प्रमाणात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनधिकृत गाड्यांची संख्या मोठी असून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.



















