गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, नागरिकांना उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जनरल फिजिशियन डॉ. शशिकांत मुळे यांनी डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारप्रवण व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मुळे यांनी सांगितले की, दुपारी ११ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. आवश्यक असल्यास सावलीचा आधार घ्यावा आणि डोक्यावर टोपी किंवा कापड वापरून उन्हापासून संरक्षण करावे. तसेच, दुपारच्या वेळेत शारीरिक कष्टाची कामे टाळणेही गरजेचे आहे.
डिहायड्रेशनची लक्षणे ओळखा
अत्याधिक तहान लागणे, त्वचा कोरडी किंवा दमट वाटणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, थकवा, डोकेदुखी आणि मळमळ ही डिहायड्रेशनची प्रमुख लक्षणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आहारात बदल आवश्यक
उन्हाळ्यात हलका, ताजा आणि पौष्टिक आहार घ्यावा. भाज्या, कडधान्ये आणि घरगुती पदार्थांचा समावेश करावा. तेलकट, तिखट आणि जंक फूड टाळल्यास शरीरातील उष्णता कमी राहण्यास मदत होते.
पाणी प्या, हायड्रेट राहा
दर १ ते २ तासांनी पाणी पिणे अत्यावश्यक आहे. कोल्ड ड्रिंक्सऐवजी स्वच्छ पाणी, नारळ पाणी किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेयांचा वापर करावा. घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने सातत्याने पाणी पिणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
रसदार फळांचा आहारात समावेश करा
टरबूज, संत्रा यांसारखी रसाळ फळे शरीराला थंड ठेवतात आणि नैसर्गिक ऊर्जा देतात. उन्हाळ्यात अशा फळांचे सेवन फायदेशीर ठरते.
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास डिहायड्रेशन आणि उष्माघातापासून बचाव होऊ शकतो, असे डॉ. शशिकांत मुळे यांनी सांगितले.



















