बीड (प्रतिनिधी विशेष) :
बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार विष्णू खेमाजी गायकवाड यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मानाचा ‘महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले असून, अमरावती येथील समाज प्रतिबिंब बहुद्देशीय संस्था, बी.एस.एफ. बहुद्देशीय संस्था, बुलढाण्यातील सत कबीर बहुद्देशीय संस्था आणि ‘उपेक्षित नायक न्यूज’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमात पत्रकारितेसह सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, प्रशासन आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील तब्बल ७० मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
मुख्य आयोजक भूषण सरदार यांच्या माहितीनुसार, हा भव्य पुरस्कार सोहळा रविवार, ३१ मे रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
विष्णू गायकवाड यांना हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यासह पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






















