जामनेर (जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार) :- जामनेर तालुक्यात फेरफार नोंदीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला जळगाव येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. वसीम राजू तडवी (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी दोन बिनशेती प्लॉटची खरेदी केली होती. या खरेदीची नोंद ७/१२ उताऱ्यावर स्वतःच्या व पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात संपर्क साधला असता, संबंधित तलाठ्याने या कामासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तलाठ्याने ४ हजार रुपये स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एसीबी जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे व भूषण पाटील यांनी ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास सुरू आहे.






















