Times of Maharashtra : भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सध्या सहा दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर लक्झमबर्गमध्ये असून, जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि युरोपमधील संबंधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या एका संवादात जयशंकर यांनी भारताची वाढती जागतिक विश्वासार्हता, वेनेजुएलातील सध्याचा संकटकाळ आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील दुहेरी भूमिका यावर परखड मत मांडले. जगाचा भारतावरचा विश्वास हा अचानक निर्माण झालेला नाही, तर अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार झाला आहे, असे सांगितले.
कोविड-19 महामारीचा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, संकटाच्या काळात भारताने केवळ स्वतःचा विचार न करता शेजारी देशांनाही मदतीचा हात दिला. अनेक देशांना पहिल्या टप्प्यात लस पुरवणारा भारत होता. तसेच श्रीलंकेत आलेले चक्रीवादळ, म्यानमार व अफगाणिस्तानातील भूकंप यावेळी भारताने तातडीने मदत पाठवली, हे जगाने पाहिले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवहारांतील दुहेरी मापदंडांवर टीका करताना जयशंकर म्हणाले की, आजच्या काळात अनेक देश स्वहित पाहून निर्णय घेतात. सल्ले देतात, पण स्वतःच्या परिसरातील हिंसा आणि धोके दुर्लक्षित करतात. हीच जागतिक राजकारणाची वस्तुस्थिती आहे. लोक जे बोलतात ते प्रत्यक्षात करत नाहीत, हे स्वीकारूनच पुढे जावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.
अमेरिकेच्या वेनेजुएलावरील कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. भारताला या घडामोडींबाबत चिंता असून, सर्व संबंधित पक्षांनी संवादातून असा तोडगा काढावा, ज्यामुळे वेनेजुएलातील जनतेची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. भारताचे वेनेजुएलासोबत दीर्घकाळापासून सौहार्दपूर्ण संबंध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या दौऱ्यात जयशंकर यांनी लक्झमबर्गचे पंतप्रधान ल्यूक फ्रीडेन आणि उपपंतप्रधान झेवियर बेटेल यांच्याशीही चर्चा केली. अर्थव्यवस्था, गुंतवणूक, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधन या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. भारत-युरोपियन युनियन संबंध २०२६ पर्यंत अधिक मजबूत होतील, असा आशावाद जयशंकर यांनी व्यक्त केला.






















