Times Of Maharashtra Desk : एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण ७ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प. गट)चे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना (उबाठा ) गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांचा समावेश आहे. तर महायुतीकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री भागवत कराड आणि धैर्यशील पाटील हे देखील निवृत्त होत आहेत.
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला किमान ३७.५ मतांची आवश्यकता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या गणितानुसार महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता असून उर्वरित ६ जागा महायुतीच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीच्या अंतर्गत वाटपानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला १ जागा, शिवसेनेला १ जागा, तर उर्वरित ४ जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या संभाव्य तीन जागा महायुतीच्या पारड्यात पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर, राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, आगामी राज्यसभा निवडणूक महायुतीसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















