विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : महानगरपालिकेत तब्बल ८७९ दिवसांनंतर आज प्रशासकीय राजवटीचा अधिकृत शेवट होत असून पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचे शासन सुरू होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया आज पूर्ण होत असून शहराच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. दीर्घकाळ प्रशासकांकडे असलेला कारभार आता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांकडे जाणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता व अपेक्षा वाढल्या आहेत.
महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ मनपाचा कारभार प्रशासकीय यंत्रणेकडे होता. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून आज महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडत आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
दुपारी १२ वाजेपर्यंत बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होणार असून त्यानंतर नव्या महापौर व उपमहापौरांकडे कार्यभार सोपवण्यात येणार आहे. यानिमित्ताने जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात भाजपचा तिसरा महापौर विराजमान होणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भाजपकडे सत्ता आली होती. त्या काळात सीमाभोळे आणि भारती सोनवणे यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. मात्र त्यानंतर सत्ता गेल्याने भाजपला अडीच वर्षे विरोधात बसावे लागले होते. आता पुन्हा बहुमत मिळाल्याने भाजपकडे महापौरपद तिसऱ्यांदा येत आहे.
निवड प्रक्रियेसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ही बैठक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीस आयुक्त, नगरसचिव तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या प्रारंभी अर्जांची छाननी केली जाईल, त्यानंतर नियमांनुसार उमेदवारांना माघारीसाठी वेळ देण्यात येईल. माघारीची मुदत संपल्यानंतर जिल्हाधिकारी अधिकृतरीत्या बिनविरोध निवडीची घोषणा करतील.
दरम्यान, प्रशासनाने नव्या महापौर व उपमहापौरांसाठी महापालिकेच्या सतराव्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था निश्चित केली आहे.येथूनच शहरातील विकासकामांवर थेट लक्ष ठेवत निर्णय घेतले जाणार आहेत. सभागृहाच्या बैठक व्यवस्थेतही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून नव्या नेतृत्वाच्या स्वागतासाठी मनपा सज्ज झाली आहे. आमदार सुरेश भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत आज नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.
तब्बल अडीच वर्षांनंतर जळगाव महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचे शासन सुरू होत असल्याने शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जळगाव मनपेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार असून शहराच्या प्रशासनात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.






















