Times Of Maharashtra Desk : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झालेल्या अजित पवारांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी ८.४६ वाजता अपघातग्रस्त झाले. या भीषण अपघातात मोठा स्फोट होऊन अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.अजित पवारांच्या पार्थिवावर २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर, सर्वपक्षीय नेते, समर्थक आणि नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांच्या निधनाला दहा दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता.
वर्धापन दिनानिमित्त होता कार्यक्रम
पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त १५ तारखेला विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाच-गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करत सर्व स्तरांतून तीव्र टीका करण्यात येत होती.
आयोजकांवर टीका;कार्यक्रम रद्द !
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेला वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली होती. त्यानंतर झालेल्या तीव्र टीकेनंतर अखेर पुणे महानगरपालिकेने वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याने महापालिका प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अखेर कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयामुळे हा वाद काहीसा निवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















