Times Of Maharashtra Desk : पंढरपूरआषाढी वारीनंतर पंढरपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल आठ महिन्यांपासून गुन्हेगारांचा माग काढण्यात अपयश येत असल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. आंदोलने, तपास अधिकाऱ्यांची बदली आणि विविध तपास पथकांची नेमणूक होऊनही या प्रकरणाचा छडा लागत नव्हता. अखेर तपासाची सूत्रे आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या हाती आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
असा धडला गुन्हा
लखन संजय जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप यांची रात्री साडेनऊच्या सुमारास भर वस्तीत त्यांच्या घरात घुसून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. लखनवर तब्बल १६ वार करण्यात आले तर संजय याच्या आईवर नऊ वार करून तिचीही हत्या करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटांत आरोपींनी दुहेरी खून करून पलायन केले होते.
हा तपास एक आव्हान होते.
घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे तपासात मोठे आव्हान उभे राहिले होते. तपासादरम्यान खुनासाठी गवत कापण्याच्या मशीनच्या पात्यांपासून खास बनवलेले हत्यार वापरल्याचे समोर आले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी विशाल शिंदे नाईक याने स्वतःच पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली होती. तसेच, घरातील ५५ इंची टीव्ही आणि काही साहित्य चोरून नेल्याचा बनाव करून चोरीचा आभास निर्माण करण्यात आला होता.या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग उघड झाला आहे.
अखेर शोध लावला
पोलिसांच्या खबऱ्याने महत्त्वाची माहिती मिळवल्यानंतर तपासाला निर्णायक वळण मिळाले. विशाल शिंदे नाईक आणि त्याचा सहकारी अथर्व शिंदे नाईक यांना अटक करण्यात आली असून, दोघेही जगताप कुटुंबीयांचे शेजारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेजारधर्मातील वैमनस्य हेच खुनामागील प्रमुख कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हत्या केल्यानंतर आरोपी राजस्थानला कामासाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशालचा मोबाईल फोन घटनेच्या वेळी सुमारे एक तास बंद होता. फोन बंद करण्यापूर्वी त्याने सहआरोपीशी संपर्क साधल्याचे तांत्रिक पुराव्यांतून स्पष्ट झाले.चौकशीत आरोपींनी चोरी केलेला टीव्ही आणि खुनाचे हत्यार चंद्रभागा नदी पात्रात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी नदीपात्रातून साहित्य जप्त केले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या दुहेरी हत्याकांडामुळे पंढरपूर पोलिसांवर गेल्या आठ महिन्यांत मोठी टीका झाली होती. मात्र, नव्या तपास पद्धतीमुळे अखेर गुन्ह्याचा उलगडा होऊन आरोपी गजाआड झाले आहेत.






















