रुपेश देशमुख ( ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : शहरातील ख्रिस्तानंद स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, दि. १३ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. विद्यालयासमोरील बॅ. राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे हे आंदोलन सुरू असून परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून विविध निवेदने देऊनही मागण्यांवर समाधानकारक लिखित उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर प्रशासनाच्या भूमिकेमुळे कंटाळून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाला राजकीय पाठबळ
आंदोलनस्थळी विविध मान्यवरांनी भेट देत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात शिक्षक आमदार सुधाकर अडबले, ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अतुल देशकर, शिवसेना प्रमुख भूषण रामटेके तसेच डॉ. मिलिंद भणारे यांचा समावेश आहे. सर्वांनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रमुख मागण्या काय?
कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये पुढील मुद्दे ठळक आहेत:
पगाराची (Basic, DA, HRA) विभागणी न करता संपूर्ण पगाराची नोंद पूर्वीप्रमाणे पगारबुकात करावी.
ग्रॅज्युएटीची रक्कम शेवटच्या संपूर्ण पगारावर आधारित द्यावी.
EPF कपात संपूर्ण पगाराच्या १२ टक्क्यांप्रमाणे नियमित जमा करावी.
शासन निर्णयानुसार सर्व प्रकारच्या रजा नियमाप्रमाणे मंजूर कराव्यात.
महागाईच्या तुलनेत योग्य व न्याय्य पगारवाढ द्यावी.
कर्मचाऱ्यांवर एकतर्फी निर्णय लादू नयेत.
किरकोळ कारणांवर शोकॉज नोटीस देणे थांबवावे.
महत्त्वाचे निर्णय घेताना कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यावे व लिखित आदेश द्यावेत.
मानसिक त्रास किंवा सेवेतून कमी करण्याच्या धमक्या देऊ नयेत.
शैक्षणिक कामकाज मोबाईलवर सुरू असताना शिक्षकांवर मोबाईल बंदीची सक्ती करू नये.
पुढील दिशा काय?
आंदोलनात सहभागी असलेल्या बहुसंख्य शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की, मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने चर्चेचे पाऊल उचलावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे शाळेतील नियमित शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाची भूमिका काय राहते आणि या संघर्षाचा तोडगा कसा निघतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



















