बांगलादेशात BNPचा ऐतिहासिक विजय, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरून भारताशी तणावाची चिन्हे

बांगलादेशात BNPचा ऐतिहासिक विजय, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरून भारताशी तणावाची चिन्हे

Times Of Maharashtrsa Desk : बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील Bangladesh Nationalist Party (BNP) ने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. या विजयाने देशातील राजकीय समीकरणे बदलली असून, नव्या सरकारने पहिल्याच प्रतिक्रियेत भारतासंदर्भात ठाम भूमिका मांडल्याने दक्षिण आशियाई राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

BNPचे ज्येष्ठ नेते सलाहुद्दीन अहमद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा भारतासमोर अधिकृतरीत्या उपस्थित केला जाईल. “आम्ही भारत सरकारला आव्हान करू की त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावे. त्या येथे येऊन न्यायालयीन प्रक्रियेला सामोऱ्या जातील,” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रश्नावर भारतावर राजनैतिक दबाव आणण्याचे संकेतही त्यांनी दिले.

विशेष म्हणजे, यापूर्वी काळजीवाहू सरकारच्या काळातही मोहम्मद युनूस यांनी अशाच प्रकारची भूमिका मांडली होती. त्यामुळे सत्तांतरानंतरही धोरणात सातत्य राहिल्याचे दिसून येते.

दरम्यान, भारताकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र हा मुद्दा द्विपक्षीय संबंधांमध्ये कळीचा ठरू शकतो, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. भारत–बांगलादेश संबंध गेल्या काही वर्षांत सहकार्याच्या नव्या टप्प्यावर पोहोचले असताना, प्रत्यार्पणाचा प्रश्न दोन्ही देशांतील राजनैतिक समतोल बिघडवू शकतो.

नव्या सरकारसमोर देशांतर्गत स्थैर्य राखण्याचे तसेच आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळण्याचे दुहेरी आव्हान उभे आहे. येत्या काही दिवसांत भारताची भूमिका काय असेल आणि या प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये कोणती राजनैतिक हालचाल होते, याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.