विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) :
जळगाव तालुक्यातील अडावणे शिवारात जमावाकडून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत एका अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव-कालंदा रोडवरील लक्ष्मी जिनिंग परिसरात सोमवारी (दि. २३ फेब्रुवारी) रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास हा तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. परिसरातील काही नागरिकांना तो मुलाला पळवून नेण्याच्या उद्देशाने आला असल्याचा संशय आला. या संशयावरून परिसरात तणाव निर्माण झाला आणि पाहता पाहता मोठा जमाव गोळा झाला.
जमावाने कोणतीही खातरजमा न करता संबंधित तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी व हाताशी मिळेल त्या वस्तूंनी बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी जळगाव तालुका पोलिसांना कळविले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असता तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या नाक-तोंडातून रक्त येत होते तसेच शरीरावर गंभीर जखमा होत्या.
जखमी अवस्थेतील तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डोक्याला व अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी) पहाटे ४:३० वाजता त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. जमावाकडून कायदा हातात घेतल्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिस अधिक तपास करत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.






















