गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, “दिवसा ऊन-वारा, कधी पावसाच्या धारा आणि रात्री थंडगार वारा” असे चित्र निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेती पिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दिवसभर कडक ऊन आणि वाऱ्याचा जोर जाणवत असताना, दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होऊन काही ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रात्रीच्या वेळी तापमानात घट होऊन थंडगार वारा वाहत असल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके काढणीच्या टप्प्यावर असून, अचानक पडणाऱ्या पावसामुळे पिके ओलसर होऊन दाण्यांची गुणवत्ता घसरत आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी पडत असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे.
अवेळी पावसाचा फटका टरबूज, खरबूज आदी हंगामी पिकांसह आंबा, मोसंबी फळबागांनाही बसत आहे. फुलोरा आणि लहान फळे गळण्याचे प्रमाण वाढले असून, तापमानातील अचानक बदलामुळे रोगराई आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. मानवी आरोग्यावरही या हवामानाचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थंडी यामुळे सर्दी, खोकला, ताप, घशाचे विकार वाढत आहेत.
डॉ. चंद्रशेखर गवळी गढी गेवराई
हवामानातील हे अनियमित बदल वातावरणीय असंतुलनाचे संकेत आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. आजारी रुग्णांनी स्वतःहून औषधी न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.






















