जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सूचक विधानामुळे या चर्चेला अधिक वेग आला आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आहेत. मात्र वाढती लोकसंख्या, वेगाने होणारा शहरी विस्तार आणि प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने नव्या मतदारसंघांची गरज व्यक्त केली जात आहे. संभाव्य पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात सुमारे ५ नवीन विधानसभा मतदारसंघ निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आमदारांची संख्या भविष्यात १६ पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभेच्या पातळीवरही बदल अपेक्षित असून जळगाव जिल्ह्यात ३ खासदार मतदारसंघ निर्माण होण्याची चर्चा आहे. सध्या जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला आहे.
या प्रक्रियेत काही विद्यमान मतदारसंघांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, रावेर-यावल मतदारसंघाचे विभाजन होऊन यावल स्वतंत्र मतदारसंघ म्हणून उदयास येऊ शकतो. तसेच एरंडोल-पारोळा, जळगाव ग्रामीण आणि पाचोरा-भडगाव या भागांमध्येही नवीन मतदारसंघ तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रामुळे प्रशासन आणि विकासकामे प्रभावीपणे राबवताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतदारसंघांचे विभाजन केल्यास प्रशासन अधिक सुलभ होईल, विकासाला गती मिळेल आणि नागरिकांना अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, देशपातळीवरही लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची संख्या वाढवण्याचा विचार सुरू आहे. सध्याची लोकसभेतील खासदारांची संख्या ५४३ वरून सुमारे ६५० पर्यंत वाढू शकते, तर महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढून आमदारांची संख्या सुमारे ३५० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात सध्या मतदार यादींचे पुनरिक्षण सुरू असून भारतीय निवडणूक आयोग चे कर्मचारी घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचना होण्याची शक्यता अधिक दृढ होत आहे.
एकूणच, जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत असून मतदारसंघ वाढीचा मुद्दा येत्या काळात अधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे.






















