गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून, हा आध्यात्मिक सोहळा दि. २६ एप्रिल ते २ मे २०२६ दरम्यान रंगणार आहे. सुप्रसिद्ध कथा व्यास सुश्री वैष्णवी भारतीजी यांच्या मधुर आणि प्रभावी वाणीमधून दररोज सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत भाविकांना ज्ञानामृताचा लाभ मिळणार आहे.
या सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आणि भूमिपूजन कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी विविध संत-महंत तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमास भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र बेदरे, माजी जि.प. सदस्य जालिंदर पिसाळ, तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक, गुरुबंधू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र (दादा) बेदरे यांनी नागरिकांना आवाहन करत, या पवित्र श्रीमद् भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सांगितले.
या सात दिवसांच्या आध्यात्मिक पर्वामुळे गेवराई शहरात भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक वातावरणाची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या आयोजनामुळे भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळण्याबरोबरच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















