नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागले आहेत. तालुकास्तरीय सक्षम समन्वय, प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद आणि चळवळीचा पाठपुरावा यामुळे या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.
दिनांक ४ मे २०२६ रोजी एकाच दिवशी तब्बल सात गावांमधील शेतरस्त्यांची मोजणी पूर्ण करण्यात आली. ही कामगिरी तालुक्यासाठी ऐतिहासिक मानली जात असून, निफाड आदर्श तालुक्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या मोहिमेच्या यशामागे उपविभागीय अधिकारी डॉ. मंगरुळे, तहसीलदार विशाल नायकवडे आणि भूमी अधीक्षक राजेंद्र भाबड यांचे महत्त्वपूर्ण नेतृत्व राहिले. तसेच महसूल मंत्री यांच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या यशाबद्दल राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, निफाड चळवळ कृती समितीचे विजय दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार, महसूल व पोलीस प्रशासन, पंचायत समिती आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे तसेच शेतकरी बांधवांचे आभार मानले आहेत.
म्हाळसाकोरे, भेंडाळी, दारणासांगवी, शिंपी टाकळी, डोंगरवाडी, हिंगणवेढे, धारणगाव परिसरातील काही गावे तसेच भुसे, करंजगाव, उंबरखेड आणि पिंपळगाव बसवंत या गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली आहे.
निफाड तालुक्याची ही प्रगती अशीच कायम राहिली, तर राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.






















