जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :
भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून नगराध्यक्ष गायत्री रूपचंद गोर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. राज्य नगरविकास विभागाने सोमवारी अंतिम आदेश जारी करत २३ एप्रिल २०२६ पासून त्यांना भूतलक्षी प्रभावाने अपात्र घोषित केले. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

वादाची ठिणगी कशी पेटली?
गायत्री भंगाळे यांनी अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणातून निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत काही नागरिकांनी जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण चर्चेत आले.
पुराव्यांनी बदलला खेळ
तक्रारदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, भंगाळे यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील महोबा येथे असून त्यांच्या कुटुंबीयांच्या शालेय नोंदीत ‘कुर्मी’ अशी जात नमूद असल्याचा दावा करण्यात आला. नियमांनुसार, इतर राज्यातून स्थलांतरित व्यक्तींना त्या राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ मिळत नाही, हा मुद्दा निर्णायक ठरला.
समितीचा निर्णय ठरला निर्णायक
जिल्हा जात पडताळणी समितीने २३ एप्रिल रोजी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आणि अखेर नगरविकास विभागाने त्यांची निवड रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला.
न्यायालयीन लढाई सुरू
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना गायत्री भंगाळे म्हणाल्या की, त्यांना अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ५ मे रोजी सुनावणी होणार आहे. आम्ही न्यायासाठी शेवटपर्यंत लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल?
या घडामोडीमुळे भुसावळ नगरपरिषदेत सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया होण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणात याचे दूरगामी परिणाम दिसून येणार आहेत.
भुसावळमधील ही राजकीय घडामोड सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















