कुमारी अश्विनी कृष्णा पावरा धुळे जिल्हा अंडर-15 मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :- किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूरच्या आदिवासी खेळाडू कुमारी अश्विनी कृष्णा पावरा हिने आपल्या जिद्द, मेहनत व सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मोठे यश संपादन करत धुळे जिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मानाची नियुक्ती मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शिरपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कुमारी अश्विनी कृष्णा पावरा ही के. व्ही. टी. आर. सी. बी. एस. ई. स्कूल शिरपूरमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून मागील तीन वर्षांपासून किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूर येथे नियमित क्रिकेट सराव करत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत सांगवी ते शिरपूर असा दररोज तब्बल २५-३० किलोमीटरचा प्रवास करून कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिची चिकाटी, शिस्त आणि खेळावरील निष्ठा ही इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी धुळे जिल्हा संघ पुण्याकडे रवाना झाला असून या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अश्विनीवर सोपविण्यात आली आहे. सदर स्पर्धेत धुळे जिल्हा संघाचा सामना छत्रपती संभाजीनगर, सी.एन.ए., सी.डी.ए. तसेच रिक्रिएशनसारख्या पुण्यातील नामांकित क्रिकेट क्लब संघांसोबत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. कुमारी अश्विनी पावरा हिला संस्थेचे क्रीडा प्रमुख व क्रिकेट प्रशिक्षक प्रा. राकेश बोरसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या प्रशिक्षणाखाली अनेक ग्रामीण व आदिवासी खेळाडू राज्यस्तरावर आपली छाप पाडत आहेत.कु.अश्विनीच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार रंधे , सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशाताई रंधे, संचालक राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे, संजय गुजर, सीमाताई रंधे, प्राचार्य सौ. सुरेखा मिस्त्री, उपप्राचार्य विवेक पाटील, समन्वयक श्री. सागर वाघ तसेच संस्थेचे सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि पालक वर्ग यांनी तिचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कु.अश्विनीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींना क्रिकेट क्षेत्रात मोठी प्रेरणा मिळाली असून तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






















