रायगड:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर) महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १५ दिवसांच्या अर्जित रजेचे (Earned Leave) रोखीकरण लागू करून १ जानेवारी २०१६ पासूनचा फरक अदा करण्यात यावा, अशी मागणी पोलीस महासंचालकांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बाबासाहेब गावडे यांनी ही मागणी केली असून, राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा महत्त्वाचा विषय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, पोलीस कर्मचारी वर्षभर कायदा व सुव्यवस्था, निवडणुका, व्हीआयपी बंदोबस्त, सण-उत्सव, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर तातडीच्या सेवांमध्ये सातत्याने कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित सुट्ट्यांचा लाभ मिळत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात अर्जित रजा शिल्लक राहते. मात्र, या रजेचे रोखीकरण अद्यापही सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन संरचनेनुसार होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शासनाने इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण लागू करून १ जानेवारी २०१६ पासूनचा वेतन फरक देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण आणि कठीण सेवा परिस्थिती लक्षात घेता शासनाने या मागणीवर लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पोलीस दलातून व्यक्त होत आहे.






















