ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते. मग मानवी जीवनाशी थेट संबंधित असलेल्या आरोग्य विभागालाच सुट्ट्यांचा आजार का जडला आहे, असा संतप्त सवाल ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेकडून विचारला जात आहे. शासनाने आरोग्य विभागाला शनिवार आणि रविवारची सुट्टी नेमकी कशासाठी दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत असून ब्रह्मपुरीतील रुग्ण अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
ब्रह्मपुरी शहर व परिसरातील ग्रामीण जनतेसाठी शासकीय रुग्णालय हाच एकमेव मोठा आधार आहे. मात्र, शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी येथील बाह्यरुग्ण विभाग ओपीडी आणि इतर महत्त्वाच्या सेवा संथ गतीने चालतात. आपत्कालीन सेवांचा दावा केला जात असला, तरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना तासनतास ताटकळत राहावे लागते. गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना थेट नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला जातो.
शासकीय व्यवस्था सुट्टीवर असताना रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा आधार असतो. मात्र, ब्रह्मपुरीतील सर्वच नामांकित खाजगी डॉक्टर शनिवार आणि रविवार येताच शहरातून गायब होतात. हे डॉक्टर मौज-मस्ती करण्यासाठी नागपूर, मुंबई, पुणे, गोवा यांसारख्या पर्यटनस्थळांवर जातात. तर काही डॉक्टर मोठ्या शहरांमधील नामांकित कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये जाऊन शस्त्रक्रिया करण्यात व्यस्त असतात. यामुळे शनिवार-रविवार स्थानिक खाजगी रुग्णालयांचे शटर अर्धवट उघडे असले तरी तिथे तज्ज्ञ डॉक्टरांची धूळ खात खुर्ची असते डॉक्टर मात्र गायब डॉक्टर नागपूर मुंबई, पुणे ,गोवा या ठिकाणी मोजमस्तीसाठी गेले असतात.
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत ब्रह्मपुरी शहरात वैद्यकीय आणीबाणी इमर्जन्सी निर्माण झाल्यास रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरात हलवताना लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेतच कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पैशांअभावी गरीब रुग्ण खाजगी आणि महागड्या रुग्णालयांचा खर्च पेलू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
“पोलीस आणि अग्निशमन दलाप्रमाणे आरोग्य सेवा ही सुद्धा अत्यावश्यक सेवा आहे. मग डॉक्टरांना शनिवार-रविवारची सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडण्याचे धोरण शासनाने का आखले?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष द्यावे. शनिवार-रविवार रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती अनिवार्य करावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरवर किंवा खाजगी हॉस्पिटलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.






















