संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर माझा समाज त्याला टराटरा फाडून धडा शिकवेल. खोटा प्रचार करून समाज फोडण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगोल्यात केली.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (दि.१४) महायुतीच्या प्रचारार्थ सांगोल्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार हे काँग्रेससोबत गेले. परंतु, काँग्रेसने शरद पवारांना प्रधानमंत्री होण्यापासून रोखले आहे, हे विसरून चालणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले.
महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार शहाजीबापूंनी सांगोला तालुक्यात दलित समाजाचा सर्व प्रकारचा निधी खर्च करून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. दलित समाजासाठी सुमारे १०० कोटींचा निधी खर्च करून समाजाचा विकास साधला, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, पाच वर्षांच्या कालखंडात तालुका सुरक्षित ठेवला. तालुक्यातील सर्व समाज घटकांना निधी देऊन विकासाच्या प्रवाहाच्या दिशेने घेऊन जात आहे. तालुक्यात १०० कोटी रुपये निधी आणून मागासवर्गीय समाजासाठी आदर्श असे वसतिगृह करण्याचा संकल्प आहे.






















