गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर एअर कंडिशनरचा वापर करत असले तरी, त्याचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या तापमान ४३ अंशांच्या पुढे जात असल्याने दिवसरात्र एसीमध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यामुळे शरीराच्या नैसर्गिक तापमानाशी जुळवून घेण्याची क्षमता कमी होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

जनरल फिजिशन डॉ. शशिकांत मुळे यांच्या मते, सतत थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडणे, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी तसेच श्वसनाचे त्रास वाढू शकतात. एसीचे फिल्टर वेळेवर स्वच्छ न केल्यास त्यामध्ये धूळ, बुरशी व जंतू साचून अॅलर्जी, सर्दी, खोकला आणि दम्याचा धोका वाढतो.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एसीचे तापमान २४ ते २६ अंशांदरम्यान ठेवावे, दर १५ दिवसांनी फिल्टर स्वच्छ करावेत आणि अधूनमधून नैसर्गिक हवा घरात येऊ द्यावी.
उन्हापासून बचावासाठी एसीचा वापर आवश्यक असला तरी तो मर्यादित आणि योग्य पद्धतीने करणेच आरोग्यासाठी हितावह ठरेल, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.






















