गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील केकतपांगरी शिवारात रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. विहिरीचे खोदकाम सुरू असताना पोकलेन मशीनचा अचानक धक्का लागून दोन जण खोल विहिरीत कोसळले. या दुर्दैवी घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने उपचारादरम्यान प्राण गमावले.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी भारत आसाराम राठोड (वय ३८, रा. हरिलाल नाईक तांडा) यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. कामाची पाहणी करत असताना भारत राठोड आणि गणेश अशोक जगताप (वय ३५, रा. तलवाडा) हे विहिरीच्या काठावर उभे होते. त्याचवेळी पोकलेन मशीनचा जोरदार धक्का लागल्याने दोघेही थेट विहिरीत पडले.

या अपघातात भारत राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या गणेश जगताप यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात येत होते; मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेनंतर पोकलेन चालकाने भीतीपोटी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दोन्ही मृतांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक सुरेश पारधी यांनी केला असून, गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही घटना पुन्हा एकदा बांधकाम आणि खोदकाम कामांदरम्यान सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची जाणीव करून देणारी ठरली आहे.






















