गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):
गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थानात महान सिद्ध साधू श्री गुरु ईश्वर भारती महाराज यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त ५२ वा जन्मोत्सव सोहळा आणि दोन दिवसीय कीर्तन महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
महोत्सवाची सुरुवात शनिवार, २ मे रोजी कलश पूजनाने झाली. पहिल्या दिवशी ह.भ.प. प्रा. त्र्यंबक महाराज मातकर (वरवटी) यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र मस्के व भाजपा युवा नेते शरद बडगे यांची उपस्थिती लाभली.
रविवार, ३ मे रोजी कीर्तनकेसरी ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांचे ‘काल्याचे कीर्तन’ रंगले. त्यांच्या ओघवत्या वाणीतून सादर केलेल्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत महादेव भारती महाराज आणि ह.भ.प. शांतिब्रह्म तुकाराम भारती महाराज यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विनोद मनोहर शेळके, गणेश मनोहर शेळके व समस्त शेळके पाटील परिवाराने या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते.
बेलगाव, वाघीरा, पोखरी, बेलखंडी, देवाच्यावाडी, पिंपरनई, सोमनाथवाडी, मुळूक, लिंबागणेश आदी गावांमधून महिला-पुरुष भाविक, वारकरी, भजनी मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते व मार्गदर्शक मंडळींच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.






















