जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हिंदू संघटन, जळगाव यांच्या वतीने दिनांक ४ मे रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून लवकरात लवकर निकाल द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नसरापूर येथील ही घटना अत्यंत निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. अशा नराधमांना रोखण्यासाठी शासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत. शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून दोषींना १५ ते २१ दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद प्रत्यक्षात आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश वाघ, उपजिल्हाध्यक्ष नागराज महाजन, योगेश बाविस्कर, महासचिव रत्ना अंतर्डे, युवा अध्यक्ष ओम प्रकाश जोशी, उपाध्यक्ष सुनील राजपूत, राजेश बंसल, महिला पदाधिकारी कुमारी मनीषा हटकर, युवा महासचिव निलेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विजय पांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर घटनेमुळे राज्यात निर्माण झालेल्या भीती आणि संतापाच्या वातावरणात पीडितेला न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.






















