गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील तलवाडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले (वय ५०) यांचे गुरुवारी (दि. २ मे) झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आठवले हे गेवराईहून तलवाड्याकडे दुचाकीवरून जात असताना दैठण फाटा, सुतगिरणी परिसरात समोरून येणाऱ्या टाटा पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
बाबासाहेब आठवले यांचा तलवाडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता. त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित तसेच गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. “बाबासाहेब आठवले यांच्या निधनाने तलवाडा परिसरात पक्षाची मोठी हानी झाली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.






















