Times of Maharashtra Desk: जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून माजी आमदार व भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. एकूण 18 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवत राऊत गटाने बाजार समितीवरील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय नेते आणि सहकारी संस्थांचे विशेष लक्ष होते. रविवारी (7 डिसेंबर) झालेल्या मतदानात तब्बल 96.48 टक्के मतदान झाले.
आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. व्यापारी मतदारसंघातील 2 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने उर्वरित 16 जागांसाठी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल पुरस्कृत परिवर्तन आघाडी आणि राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडीमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. याशिवाय 4 अपक्ष उमेदवारही रिंगणात होते.पहिल्या फेर्यांतच राऊत गटाने आघाडी घेत विजयाची मालिका कायम ठेवली. व्यापारी, हमाल-तोलार, ग्रामपंचायत आणि सोसायटी अशा मतदारसंघांतून राऊत गटाने सलग विजय मिळवत एकूण 11 जागा आपल्या खात्यात जमा केल्या.
सोसायटी मतदारसंघातील उर्वरित 7 जागांचे निकाल अद्याप लागायचे असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीही, राऊत गटाचे बहुमत स्पष्ट झाल्याने बाजार समितीवरील सत्ता त्यांच्याच हातात राहणार हे निश्चित झाले आहे.
सभापती कोण होणार?
मतमोजणी केंद्राबाहेर दोन्ही गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते. पहिल्या निकालानंतरच राऊत समर्थकांनी जल्लोष सुरू केला. सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर आता सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे—सभापतीपदाची निवड कोणाची? गेली 5 वर्षे सभापती राहिलेल्या रणवीर राऊत यांना यंदा उमेदवारी देण्यात आली नव्हती, मात्र संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे आता सभापतीपदाचा मान कोणाला मिळतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या निकालाचा बार्शी तालुक्यातील सहकार, राजकारण आणि सत्तेच्या समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून पुढील काही दिवसांत सभापतीपद आणि सत्ता वाटपावर मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






















