Times of Maharashtra Desk: महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत मोठा गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं.संतप्त कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाहनांना घेराव घालत निषेध व्यक्त केला. यावेळी कराड यांच्या गाडीवर काळं फासण्यात आलं, तर सावे यांच्या वाहनालाही विरोधाचा सामना करावा लागला. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिस संरक्षणात दोन्ही नेत्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आलं.
या आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने अंगावर ज्वलनशील द्रव ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, उमेदवारी वाटपात सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असून नेत्यांच्या पीए आणि नातेवाईकांना तिकीट देण्यात आलं. अतुल सावे यांनी त्यांच्या पीएला, तर भागवत कराड यांनी विशिष्ट समाजातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. संतप्त कार्यकर्त्यांनी सावे आणि कराड यांचे फोटो फाडत जोरदार घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांकडून अश्लील भाषेचा वापर झाल्याचंही दिसून आलं.
महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेत नेत्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला. “आमच्या घरांमध्ये नेते येत होते, त्यासाठी आम्ही लाखो रुपये खर्च केले. शेवटपर्यंत आश्वासन दिलं, मात्र तिकीट नाकारण्यात आलं,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही,” अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.दरम्यान, इच्छुक उमेदवार भदाने पाटील यांनी, “मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो. रात्रंदिवस पक्षासाठी काम केलं, मात्र साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझ्यावर अन्याय केला,” असा आरोप केला. “मला अंधारात ठेवलं गेलं असून, आता काही घडलं तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
तर उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या सुवर्णा मराठे यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील हा अंतर्गत वाद निवडणुकीच्या तोंडावर अधिक तीव्र होत असून, याचा पक्षाच्या निवडणूक रणनीतीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






















