रुपेश देशमुख ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी :-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून ब्रह्मपुरी शहरात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने मुली आणि महिलांसाठी एका भव्य ‘ओपन सायकल रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिल रोजी होणाऱ्या या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जाणार आहे. मात्र, दुसरीकडे या मोठ्या सामाजिक आणि वैचारिक उत्सवाचा स्थानिक काँग्रेसला विसर पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी रेस
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने यावेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. मुली आणि महिलांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
असा असेल स्पर्धेचा मार्ग
ही स्पर्धा मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता ब्रह्मपुरीतील मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होईल. स्पर्धेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुंबळी मेंढा असा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी शहरातील मुली आणि महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
ब्रह्मपुरीत ही भव्य सायकल रेस चर्चेचा विषय ठरत असतानाच, आयोजकांकडून आणि राजकीय गोटातून काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. “एकिकडे भाजप महिलांच्या सन्मानासाठी आणि महामानवाच्या विचारांच्या प्रसारासाठी रस्त्यावर उतरून उपक्रम राबवत आहे, तर दुसरीकडे ब्रह्मपुरीचे सत्ताधारी आमदार विजय वडेट्टीवार नेत्यांना या जयंती उत्सवाचा आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या सामाजिक कार्याचा विसर पडला आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसला केवळ मतांच्या राजकारणाचेच भान उरले का?”
भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे
“विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता ते कृतीतून उतरवणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी आयोजित केलेली ही सायकल रेस हा त्याच विचारांचा एक भाग आहे. आमची महिला आघाडी या उपक्रमातून घराघरात आंबेडकरी विचार पोहोचवत आहे,” असे मत भाजपच्या एका स्थानिक महिला पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
दुसरीकडे, काँग्रेसच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. “शहरात इतका मोठा सामाजिक उपक्रम भाजप राबवत असताना, आपल्या पक्षाचे स्थानिक नेतृत्व काय करत आहे? केवळ निवडणुका आल्यावरच महापुरुषांची आठवण होणार का? काँग्रेसला या जयंती उत्सवाचा विसर पडला आहे का, असा प्रश्न पडतोय,” अशा शब्दात एका संतप्त कार्यकर्त्याने आपले मत मांडले.
ब्रह्मपुरीतील नागरिकांमध्येही या विषयावर चर्चा रंगली आहे. “महापुरुषांची जयंती साजरी करताना सर्व पक्षांनी पुढाकार घेणे अपेक्षित असते. मात्र, भाजपने महिलांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे त्यांनी आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस या शर्यतीत मागे पडल्याचे स्पष्ट दिसत आहे,” असे मत सामाजिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
भाजप महिला आघाडीच्या वतीने या सायकल रेसमध्ये जास्तीत जास्त मुली आणि महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हा उपक्रम मैलाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






















